मुंबई: गोरेगाव पश्चिम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'प्रबोधन मित्र मंडळा' च्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या पावन पर्वावर काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. हजारो नागरिक, तरुण, महिला आणि बालकांच्या सहभागामुळे गोरेगावच्या रस्त्यांवर एकतेचे आणि श्रद्धेचे अभूतपूर्व दर्शन घडले.
 

​पारंपारिक ढोल-ताशांचा गजर, फडकाणारे भगवे ध्वज, चित्तवेधक देखावे आणि शिवकालीन पेहरावात सजलेले तरुण हे या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते. महाराजांच्या शौर्याचा आणि 'हिंदवी स्वराज्याचा' संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी ठरला. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून या रॅलीचे स्वागत करण्यात आले, तर “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

युवा समाजसेवक किरण जाधव यांचे कुशल नियोजन

​या भव्य सोहळ्याच्या यशस्वी नियोजनाची आणि आयोजनाची धुरा युवा समाजसेवक व धडाडीचे नेतृत्व किरण जाधव यांनी सांभाळली. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सुरक्षा व्यवस्था, शिस्त आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्कृष्ट समन्वय पाहून स्थानिक नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

सामाजिक समरसतेचा संदेश

​किरण जाधव यांची खासियत म्हणजे ते केवळ शिवजयंतीच नव्हे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेतही तितक्याच सक्रियतेने सहभागी होतात. शिवरायांचा स्वाभिमान आणि बाबासाहेबांचे संविधान या दोन्ही विचारांना सोबत घेऊन, समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधण्याचे महत्त्वाचे कार्य ते करत आहेत. महापुरुषांची जयंती ही केवळ उत्सव नसून ते सामाजिक एकता आणि बंधुभावाचे प्रतीक आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.